२० एप्रि, २०१३

फेसबुक - वेगवेगळ्या नजरेतून

मुझे तो तेरी लत लग गई ........... 
                                             लग गई ......... .....
                                                                  जमाना कहे लत ये गलत लग गई !!!!!!!!!!!



इकडे आबाच्या ढाब्यात (अबू धाबी) आल्यापासून तशी फेसबुकाची सवय झाली.

नकोच , फोटो नकोच लावूया, उगाच कॉपी करून आपल्याच मित्रांना रिक़्वेस्त पाठवतात म्हणे. त्यापेक्षा फोटो रिकामा  ठेवलेला बरा.

अरे बापरे, त्याच्या फोटोला किती लाईक आले. अगदीच फ़ेमस आहे रे तो ! ३ हजार मित्र आहेत त्याचे  फेसबुकवर ? ओ नो !!!

त्यापेक्षा  असं करू का, माझे मित्र इतरांना नको रे दिसायला. उगाचच प्रायवसी जाते.

त्यांचं  काय, बघावं  तेव्हा सारखे नुसते इकडे -तिकडे ट्रिपा  काढत  असतात आणि आले की  टाकतात फोटो फेस्बुकावर. उगाचच फ़्रस्ट्रेशन येतं  ते फोटो बघुन. आमचं कधी फिरायला जाण होतंय देव  जाणे. लाईक तर करूया.

नाहीतरी  दिवसभर घरी काही काम असते का? सारखं उगाच काहीतरी पोस्टत असतात. उगाचच पान  भरून जातात.

फोटो खरच छान  आहे पण  लगेच नको लाईक करायला नाहीतर वाटायचं सारखं फेसबुकवर पडीक असते. नंतर सवडीनं करु.

पण मी म्हणतो,  आपलं  व्यक्तिगत आयुष्य दुसऱ्यांसमोर कशाला उघडं पाडायचं, पर्सनल फोटो नकोच. बाकी काय ते टाकू.

नाही …………… नाही! ……………………… ………………. मी काही त्यातला नाही हं! आमचे फोटो म्हणजे सामाजिक, नैसर्गिक, वैचारिक  असतात कारण आमचा ग्रुप वेगळा आहे ना? आमचं  आपलं वेगळं हं!

ऑफिसातही बघावं तेव्हा स्टाफ निम्मा  वेळ  एफ बी वरच असतो म्हणे.

त्याचं / तिचं स्टेटस सिंगल आहे की कमीटेड कि इंगेज्झ.  रिक्वेस्ट पाठवू का?

माझं नाही रे बाबा तसं, रात्री फक्त एकदा अपडेट्स चेक करतो इतकंच. वेळ कुठे असतो?  एखादा  महत्वाचा निरोप चुकला तर म्हणून आपलं  चेक करतो इतकच.

फेसबुक तर हल्ली चर्च चे फादरच झालेत. कोटेबल कोट्स आणि देवादिकांच्या तसबिरी, हे लाईक करा म्हणजे चांगली खबर ऐकायला मिळेल वगैरे- वगैरे. जनरल नॉलेज मध्ये भर पडते म्हणे.

कोटेबल कोट्स रोज वाचायचा कंटाळा आला तरी त्यातला एखादा आपल्या रोजच्या दिनक्रमात घडलेल्या प्रसंगांशी  मिळता-जुळता  असला कि आपण पटकन लाईक करतो वा  कम्मेंटतो.

काय करू सकाळ झाली की सर्व कामे उरकल्यावर हात आपोआप कम्पुटर कडे वळतात. फक्त पाचच मिनिट करता -करता कधी अर्धा-एक तास निघून जातो ते कळत हि नाही.

मुलाबाळांची मेडलं- प्रशस्तिपत्रक पोस्टताना मात्र आई-वडीलांच्या अंगावर मुठभर मांस अधिक चढतं हे मात्र नक्की.

या वर्चुअल जगाचा एक मोठा फायदा म्हणजे आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तींशी जगातून कुठेही जोडलेले राहतो हे मात्र खरं. पण हे खरच वर्चुअल असतं नाही ? यात फक्त आनंद व्यक्त केला जातो, पण आतला मत्सर, रोजचं दु:ख, टेन्शन, चिडचिड, एकमेकांबद्दलचे हेवेदावे  बाहेर येवू दिले  जात नाही किंबहुना येवू देवू नये हेही नसे थोडके.