२७ नोव्हें, २०१२

मागे वळून पाहता............

 

हो नाही करता करता शेवटी पुतणीच्या लग्नाला भारतात जायचे ठरले तेही अगदी एक दिवस आधी. मुलाची परीक्षा-शाळा, तसेच दोन महिन्यापूर्वीच भारतात जाणे  झालेच होते,  पण शेवटी जायचे ठरले  त्यामुळे तयारी करायलाही वेळ मिळाला नाही. तसेच घाई - गडबडीत पुण्यात पोहोचलो. साखरपुडा  दोन महिने आधीच झाला होता. त्यादिवशी हळदीचा कार्यक्रम, देवक,  दुसऱ्या दिवशी लग्नही सनई-चौघड्याच्या आवाजात अगदी  धुमधडाक्यात  पार पडले. असं  वाटलं  बर  झालं लग्नाला गेलो ते.  नाहीतरी 'लग्न आयुष्यात एकदाच होते नं  काकी......', हा पुतणीचा विचार मनात घर करून राहिला होता!



 तिसऱ्या दिवशी अबू धाबीचा  परतीचा प्रवास होता. पुणे-मुंबई महा मार्गावर मध्येच खोपोलीमध्ये नवऱ्या  मुलीचे सासर असल्याने सत्यनारायणाच्या  पूजेसाठी धावती भेट द्यावी असेही ठरले. नवऱ्या मुलीला, तिच्या  नवऱ्याच्या घरी, हसती पाहून थोडे हायसे वाटले. हळदीकुंकू, ओटी प्रसाद वगैरे घेतला  . जाताना 'काकी' म्हणून गळ्यात  पडली आणि खूप खूप रडली बिचारी.  आम्ही तिचा निरोप घेवून परत गाडीत बसलो

 आणि नकळत विचारचक्र सुरु झाले. शहरात वाढलेली हि मुलगी, ह्या नगरात दिवसभर काय करेल बुवा? नवऱ्याची ड्यूटी थोडी लांब पनवेलला असल्याने त्याला सकाळीच घराबाहेर पडणे भाग असेल. मग हि दिवसभर काय करेल? कि तिचेही आयुष्य तुझ्या-माझ्यासारखेच सासू-सासरे, घरकामे, जेवणखाण  यातच तिचा दिवस निघून जाईल. शिक्षण बिफार्मसी झाले असल्याने पुढे - मागे नोकरी करेल कि जमणार नाही !!!  पण सुट्टीच्या दिवशी ती कुठे फिरायला जाईल बरे . आमची  विकेंड साजरा करायची कल्पना म्हणजे, माल शॉपिंग किंवा पिक्चर किंवा उगाचच भटकणे, खरेदी, मित्रमंडळी इ . मग ती इकडे  काय करेल बरे?  ती व्यवस्थित सेट होईल ना?  सासूसासरे तिच्याशी जमून घेतील न? असे हजारो प्रश्न मनात येऊ लागले.   शेवटी प्रत्येक मुलीचे आयुष्य लग्नानंतर असेच असते हे मनाशी पटवले . माहेरी लाडाकोडात वाढलेली मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. माहेरची नाळ तोडून  सासरच्या नव्या  नात्यांशी सोयरिक जुळवता-जुळवता ती त्यातच कधी  एकवटून जाते हे तिचे तिलाही कळत नाही. तिच्याबाबतीतही  असेच घडेल हा विश्वास वाटू लागला.

हा विचार करून माझ्याबरोबर  तो ही थोडा अस्वस्थ झाला. परत  गाडीत बसल्यावर  त्याने माझा हात नकळत घट्ट पकडून ठेवला. मी म्हटले काय झालं  रे बाबा ? इतकं अस्वस्थ व्हायला काय झालं?   तो म्हणाला - १३ वर्षांपूर्वी  तू ही  अशीच माझ्याबरोबर घरच्यांचा विचार न करता केवळ माझ्या विश्वासावर , सगळं- सगळं  मागे टाकून आली होतीस. आई-वडील, भाऊ-बहिण असलेल्या त्याच्या छोट्याश्या घरात मी ही असाच अलगद, समजून-उमजून  प्रवेश केला होता.  माहेरचा त्यावेळी आधार नसल्याने पुढे काय होईल हेही माहित नव्हते. त्यावेळी माझ्या मनाची  झालेली चलबिचल, माझ्या त्यावेळच्या भावनांचा ओलेपणा  त्याला जाणवला  होता.  त्याच भावना, तीच उत्कटता, तीच अस्वस्थता, तोच उत्साह  आज त्याने,   पुतणीच्या रूपाने ,  १३ वर्षांनी, पुन्हा अनुभवला.

मी केलेल्या so  called त्यागाची (लग्नानंतर प्रत्येक मुलीला कराव्या लागणाऱ्या)   त्याला आवर्जून जाणीव  झाली.  मला  अपेक्षित असलेले  आनंदी आयुष्य तो  देऊ शकला, मी खरोखरीच खूष  आहे ना  ह्याची शाश्वती आणि पावती  माझ्याकडून मिळाल्यावर नकळत त्याचेही डोळे पाणावले आणि तृप्ततेचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागला.

एक्प्रेस हायवेला गाडी भराभर रस्ता कापत  होती. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी  झाडे अधिकच हिरवीगार भासू लागली. तिचेही सगळं  काही सुरळीत होईल या आशेने आम्ही पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो होतो.

१२ नोव्हें, २०१२

तिचे अस्तित्व ..... अव्यक्त

 तिचे अस्तित्व  अलिप्त, अपर्याप्त ..... अव्यक्त

ती अगदी लहान असल्यापासून एक नेहमीसारखी शाळेत जाणारी एक गोंडस कळी  होती. स्वातंत्र्य  मिळायच्या आधीच्या एक वर्ष आधीचा  तिचा जन्म. त्याकाळची १० वी म्हणजे शिक्षणाचा ब-यापैकी मोठा पल्ला म्हणायचं. बघता बघता शिक्षण संपून लग्नही झाले.  शहरातल्या एका औषध कंपनीत नोकरीही थोडे दिवस चालू होती.  सर्व काही सुरळीत चालू होते.

पदरी  लगोलग  दोन मुलीही झाल्या. कर्मधर्मसंयोगाने तिसरीही मुलगी झाली आणि काही कळायच्या आताच तिला वेडा चे झटके येवू लागले. छोट्या मुलींना तर जग म्हणजे काय हेही  कळत नव्हते. थोडे काही झाले तर आईच्या कुशीत लपू पाहणारे मुल, त्यांना जवळ घ्यावे हे ही  तीला  कळत नव्हते . हळूहळू घरात भांड्यांची आदळ  आपट  , वायफळ बडबड करणे,  मुलींना मारझोड करणे सुरु झाले. अहोंनाही  तिला कसे आवरावे कळत नव्हते. डॉक्टरी उपायही करून झाले. पण परिस्थिती जैसे थे. मग घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही  होणारा  त्रास कमी करण्यासाठी,    खात्रीचा उपाय म्हणून शेवटी कोर्टाची परवानगी घेवून तिला उपचारासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये  भरती करण्यात आले. गोळ्या-औषधे, शॉकट्रीटमेन्ट इ. इलाज झाल्यावर घरी आणण्यात आले.  थोड्या दिवसांनी परत  तीच  कथा. त्यातच पदरात आणखीन एक  कन्ये ची भर पडली. पुन्हा दोनतीनदा मेंटल हॉस्पिटलचे दौरे-तीच शॉक ट्रीटमेन्ट , तिच्या जीवाची आणखीनच घालमेल होत होती. पण नव-यापुढेही   दुसरा इलाजच नव्हता. यातच पुढची १०-१२ वर्षे गेली.

 मग कोणी ओळखीच्यांनी  सुचवल्यावर मानसिक आरोग्य केंद्रात  उपचार सुरु केला. आणि तिचे तऱ्हेवाईक  वागणं  व बोलणे ब-यापैकी आवाक्यात आले.  पण त्यानंतर ती  एक लहान मुलच  झाली. घराची  चौकट न ओलांडता येणारी,  रोजची औषधे, जेवणे , झोपणे  आणि लहान मुलासारखेच भांडणे, हट्ट करणे हाच दिनक्रम आजतागायत सुरु आहे. कधी कधी वाटते यात तिची स्वत:ची काय चूक होती. तिनेही  एका सामान्य स्त्रीसारखी संसाराची स्वप्ने बघितली होती. पण दैवाने तिला काय दाखवले? अजूनही गेली ३०-३५ वर्षे   ती गोळ्या औषधे यांच्याच गर्तेत अडकली आहे.  दुर्देवाने त्यातच पडण्याचे निमित्त होवून आलेले पंगुत्व. वॉंकरचा आधार घेवून घरातल्या घरात  चालता येण्याजोगी स्थिती. पण तिचे मन मात्र कायम एका लहान मुलासारखेच. 

लहान मुलासारखेच भांडणारी,
 
वेगळे काही खायला हवे म्हणून अट्टाहास करणारी , 
 
कधी शरीराच्या दुखणाऱ्या,  थकलेल्या अवयवांची जाणीव होणारी ,

नकळत  अश्रूंनी भरून येणारे, पण कारण न सांगता येणारे  तिचे डोळे,
 
मधेच अनंतात विलीन झालेल्या अहोंची  अस्वस्थ करणारी  आठवण,

मधेच  तिला कधी रिक्ष्याने ऑफिसला  असते, तर  कधी  कोणी गावाला बोलावलेले असते,    कधी मुली सासरहून येऊन  दारात उभ्या असतात  असे होणारे विचित्र  भास,



तर कधी स्वत:चीच स्वत:शी  चाललेली मुक्त  बडबड.

मघ कधी कधी प्रश्न पडतो?  काही व्यक्तींच्या बाबतीत असे का घडते? यालाच नशीब म्हणायचे कि  आपण स्वत:च आपले नशीब घडवू शकतो यावर विश्वास ठेवावा कि नाही हा पडणारा प्रश्न,
 
किंवा पहिला श्वास आणि शेवटचा श्वास आपल्या हातात नसणाऱ्या,  आणि त्या दोन श्वासांच्या दरम्यान घडणाऱ्या घटनांचे उत्तरदायित्व आपण स्वत: स्वीकारावे का ?
 
 की , पूर्वजन्माचे संचित कर्म ?????
 पूर्वजन्मीचे संचीत  कर्म मानले तरी मग तिला स्वत:ला   या जन्मात ,  पापपुण्याचा  हिशोब करण्याची एक संधी,   नवीन कर्म संचयनाचा काहीच अधिकार नाही का ?


नकळत कवयत्रीच्या ओळी आठवतात.

त्या पैलतीरावर  .............. मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ         ......... सोबत आणि उबारा.
 

आजारपणाचे निमित्त

आजारपणाचे निमित्त





मला कुठली गोष्ट होऊ नये  विचारलं तर ती म्हणजे कधी आजारी पडणे. पण माहिती आहे की  याला इलाजच नसतो. बाकी विशेष नाही पण वर्षातून  एक-दोनदा येणारे व्हायरल आजार कधीकधी डोकं वर काढतातच. आजारी पडल्यावर सर्व संसारी स्त्रीयांना   होणारी अडचण म्हणजे घरातल्या कामांचे कसे होणार????? हा एक मोठा प्रश्न  उभा ठाकतो.  इतर कामांचे राहून गेले तरी  चालून जाते पण स्वयंपाकाचे, आणि त्यानंतर लागून येणारी कामे , भांडी, ओटा , फ्रीज मध्ये सारखे ठेवणे-काढणे  याचं  काय?

 एकतर कुटुंबात इनमिन तीन माणसं. जेवायला तिन्ही वेळा तर हवेच त्यात अहोंचे पाक कौशल्य चहा, दुध गरम करणे  आणि मी स्वत: समोर असल्यांवर,     सांगितल्याप्रमाणे,   क्रमाने,  मोजून पदार्थ घालून,  वरणाला घालता येणारी फोडणी,  इथपर्यतच मर्यादित.   आणि नंतर ओट्यावर होणारा पसारा जसेकी लवंडलेली मोहरी,
कांद्या-लसणाची सालपटं,
टोमाटोच्या फोडींच्या गळणाऱ्या  धारा,
अन कोथिंम्बिरीच्या काड्या,
आणि वर भांडयांचा पसारा    बघून आधीच  आजारी असलेल्या मला,  घेरी येण्याचीच बाकी असते.

त्यात इथे दुसऱ्या देशात राहायला आल्यापासून पुण्यातल्या सारखी कामवालीही मदतीला नाही. भांडी, झाडलोट, सणावाराला  स्वयंपाकातही मदत करणारी सुमन, तिची खूपच आठवण येऊ लागते.   इथे कामवालीचा मोठा प्रश्न. बांगलादेशी पुरुषही  इथे घराची कामे करतात  किंवा श्रीलंकन बायका. पण इथल्या कामवालीचा पगारही अवाढव्य.  त्यात तिलाही शुक्रवार-शनिवार सुट्टी, मग फक्त पाचच दिवसांसाठी  कामवाली ठेवावी की   नाही हाही प्रश्न होताच. तिच्या पगारएवढी रक्कम भारतीय चलनात रुपांतर केल्यास होणारी काही  हजार रक्कम. मग तेवढीच रक्कम   माझ्या खात्यात माझ्याच सांगण्याप्रमाणे अगदी ठराविक तारखेला  जमा होत होती. त्यामुळे कामवालीच्या मदतीची अपेक्षा  करणे  चुकीचेच. 

बर हॉटेलांची ही  इथे-अबू धाबीत  बऱ्यापैकी  चलती आहे,  दक्षिण भारतीय लोकं  खूप असल्याने त्यांच्या  पद्धतीची हॉटेलं . एखाद्यावेळी इडली-डोसा-सांभार  चालून जाते पण रोज तेच खाणे, सारखे-सारखे हॉटेल चे खाणे  नको वाटते. घरचे  साधे वरण-भातही  आजारपणात  बरे वाटते. त्यामुळे स्वयंपाकाचा प्रश्न काही केल्या  उरतोच.  आणि मग मात्र  त्या काळात अहोंना पूर्ण जाणीव होते ती
                      अरे संसार संसार
                     जसा तवा चुल्यावर
                     आधी हाताला चटके 
                     मग मिळते (बायकोला, मुलाला  आणि मलाही ) भाकर


अश्यातच चार-पाच दिवस गेल्यावर मग जरा बरे वाटू लागते,  बऱ्याच जणांना आजारी असल्यावर औषधं घेतल्यावर गाढ झोप लागते, पण माझे डोळे मात्र टकाटक रात्री उघडे असतात आणि मग अजून चिडचिड होते कारण दुसऱ्या  दिवशीचे स्वयंपाक घराचे चित्र डोळ्यासमोर उभे ठाकते आणि मग  खरेच  वाटते हे आजारपण येवूच नये आणि आलेतरी पटकन संपावे.